भारतातील जाती त्यांची घडण, उत्पत्ती आणि प्रसार
Bhartatil Jati Tyanchi Ghadan Utpatti Aani Prasar book by Dr. B. R. Ambedkar
लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आता माझ्या उत्पत्तीच्या मुख्य मुद्यांचे सार सांगतो. माझ्या मते जातीने अनेक संशोधकांच्या मनात भ्रम निर्माण केल्यामुळे संशोधन कार्यात, बहुतेकांनी चुका केल्या आहेत. पाश्चात्य पंडितानी जातिव्यवस्थेत वर्णाला ( रंग ) अनाठाई महत्व दिले आहे. वर्णासंबंधी त्यांच्या मनात आधीच वर्ण द्वेषाची कल्पना असल्यामुळे जातीव्यवस्थेतही तोच प्रमुख दुवा असला पाहिजे अशी त्यांनी सहजच कल्पना करून घेतली. परंतु यापेक्षा अधिक खोटी गोष्ट असू शकत नाही. म्हणूनच डॉ. केतकरांचा आग्रह योग्य आहे. ते म्हणतात. "सर्वच राजेरजवाडे मग ते स्वतःला तथाकथित आर्य वंशाचे समजोत की द्रविड वंशाचे समजोत वस्तुतः आर्यच होते. जोपर्यंत पाश्चात्य विद्वान येथे येऊन त्यांनी आर्य व द्रविड यांच्यात भिन्नतेची रेषा काढावयास सुरवात केली नाही तोपर्यंत येथे एखादी टोळी किंवा कुटुंब वंशदृष्टया आर्य आहे की द्रविड आहे या प्रश्नाने लोकांना कधीच सतावले नाही.' चामडीच्या रंगाचे महत्व मानण्याचा कल फार काळापूर्वीच संपला आहे. यानंतर पुन्हा त्यांनी स्पष्टीकरणाच्या नावाने नुसते वर्णन केले. आणि जणू काही त्या जातीच्या उगमाच्या उत्पत्ती आहेत असे समजून त्यावरच ते झगडत बसले. धंदेवाईक, धार्मिक इत्यादी प्रकारच्या जाती आहेत ते खरे, परंतु कोणत्याही अर्थाने ते जातीच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण ठरू शकत नाही. धंदेवाईक वर्गाना 'जाती' का म्हणण्यात येते हे अजून आपणास शोधावयाचे आहे; पण हा प्रश्न कधीही उपस्थित करण्यात आला नाही. जाती संस्था ही एखाद्या फुंकरीने निर्माण होण्यासारखी वस्तू असावी त्या प्रमाणे त्यांनी जातीचा प्रश्न ढिलेपणाने हाताळला आहे. या उलट समजून घेण्यास अत्यंत बिकट असा प्रश्न आहे हे मी स्पष्ट केलेच आहे. कारण त्यामागे असणाऱ्या अडचणी अवाढव्य आहेत.
जात श्रद्धेवर आधारलेली आहे हे खरे; पण एखाद्या संस्थेचा आधार म्हणून श्रद्धा उदयास येण्यापूर्वी तिला बळकटी आणण्याची व सतत चालू ठेवण्याची आवश्यकता असते. जातीच्या माझ्या अभ्यासात चार मुद्दे अंतर्भूत आहेत :(१) हिंदुसमाजाची रचना संयुक्त स्वरूपाची असली तरीही तेथे गंभीर स्वरूपाचे सांस्कृतिक एैक्य आहे. (२) जात म्हणजे एका मोठया सांस्कृतिक एैक्य असलेल्या समाजाचा एक अंशात्मक तुकडा आहे. (३) जातीची सुरवात करणारी पहिली एक जात आहे. (४) अनुकरणाच्या व बहिष्काराच्या माध्यमाद्वारे वर्गाचे रूपांतर जातीमध्ये झाले.
ही कृत्रिम संस्था नष्ट करण्यासाठी अलिकडे मोठया चिकाटीने प्रयत्न केल्या जात असल्यामुळे या जातीच्या प्रश्नाला आज विशेष महत्व प्राप्त झाले आहे. तथापि अशाप्रकारच्या सुधारणावादी प्रयत्नामुळे तिच्या उत्पत्ती संबंधी मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाले. एखाद्या सर्वसत्ताधारी व्यक्तीने जाणीवपूर्वक आज्ञा देऊन ती निर्माण केली की एका विशिष्ट परिस्थितीमुळे मानवी समाजाच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत ती आपोआप निर्माण झाली अशा वादाच्या बाजू आहेत. जे दुसऱ्या क्रमांकाची बाजू घेतात त्यांना माझ्या निबंधातील मद्यांमध्ये विचाराचे खाद्य सापडेल अशी मला आशा वाटते. याचा प्रत्यक्ष उपयोग होवो की न होवो परंतु हा जातीचा विषय सर्व समावेशक आहे, आणि त्याच्या तात्विक बैठकीबद्दल माझ्या मनात जिज्ञासा निर्माण झाल्यामुळे माझे निष्कर्ष तुमच्यासमोर मांडण्याची मला इच्छा झाली. मला वाटते माझे निष्कर्ष योग्य पायावर आधारलेले असून खंबीरपणे उभारलेले आहेत. तथापि ते कोणत्याही दृष्टीने अंतिम स्वरूपाचे आहेत असे समजण्याइतका दुराग्रही मात्र मी नाही. उपकारक सत्य शोधण्यासाठी माझ्या मते संशोधनाचा एक योग्य असलेला मार्ग सुचवावा असा माझा प्राथमिक हेतू यामागे आहे. तथापि पुर्वग्रहदूषित होऊन या विषयाकडे जाण्यापासून आपण सावरले पाहिजे. भावनांना शास्त्राच्या कक्षेबाहेरच बंदी घातली पाहिजे व वस्तूंचे निरीक्षण वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातूनच केले पाहिजे. एखाद्या विषयावरील काही उत्पत्ती नेहमीसाठी वादग्रस्त होऊन बसत असतात. असे असले तरी जेथपर्यंत माझा संबंध आहे. तेथपर्यंत मी सांगू इच्छितो की एखाद्याचा बुध्दिवादी दृष्टीकोनातून माझ्याशी मतभेद झाला तर माझे विचार प्रत्यक्ष सोडून देण्यातही मला आनंदच होईल. सारांश, जातीची उत्पत्ती मांडण्याची माझी ज्याप्रमाणे आकांक्षा आहे त्याप्रमाणेच जर ती समर्थनीय नाही असे दाखवून दिले तर मी ती सोडून देण्यासही तयार आहे.